सासवड (पुरंदर) : शाम जगताप
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील साठे नगरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व स्मृतिदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात, आदरभावाने आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाषजी वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित, कष्टकरी आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून दिले. त्यांच्या विचारांची आजच्या समाजात अधिक गरज असून सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास युवक प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल काका भोंडे, पश्चिम महाराष्ट्र व पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप, सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ अडागळे, महाराष्ट्र राज्य वरिष्ठ संपर्कप्रमुख भानुदास भिसे, पुणे जिल्हा वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप भोंडे, अजित पाटोळे, पुणे जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष श्वेता आडगळे, किशोर अडागळे, राजू आडगळे, ज्ञानेश्वर आडगळे, सचिन भोंडे, गणेश भोंडे, पिनू शेठ पाटील, सृष्टी बडदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजात जागवलेल्या परिवर्तनाच्या चळवळीचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रतिज्ञा केली. समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा तसेच सामाजिक न्याय, समानता आणि बंधुभावाची मूल्ये अधिक बळकट करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




