“जीव धोक्यात घालून शाळेचा प्रवास! पुलाअभावी स्टंप डॅमवरून विद्यार्थ्यांची रोजची जीवघेणी कसरत”

विदिशा (मध्य प्रदेश) : Rjnews 27 मराठी 

शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असला तरी मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांना हा अधिकार मिळवण्यासाठी रोज जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उफाळलेल्या स्टंप डॅमवरून चालत जावे लागत असून या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित परिसरात सुरक्षित पुलाची व्यवस्था नसल्याने शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना पाण्याने भरलेल्या डॅमवरून मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर हा मार्ग अधिकच धोकादायक बनतो. एखाद्या विद्यार्थ्याचा पाय घसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेला पूल अद्याप उभारला गेला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शाळेत पोहोचण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग किंवा कायमस्वरूपी पुलाची उभारणी तातडीने करण्यात यावी. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पुलाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. शिक्षणापूर्वी विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करणे हीच शासनाची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *