राज्यात उष्णतेची तीव्र लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांना सावधतेचा इशारा

राज्यात उष्णतेची तीव्र लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांना सावधतेचा इशारा

राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने 13 मे 2026 रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अकोला, अमरावती आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात आकाश निरभ्र राहणार असून दुपारच्या वेळेत सूर्याच्या तीव्र किरणांमुळे उष्णतेचा मोठा प्रभाव जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग परिसरात दमट उकाड्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून नागरिकांना घाम आणि उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कोरडे व उष्ण हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुपारच्या वेळेत उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, parbhani आणि बीड जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. या भागात दिवसभर कोरडे आणि उष्ण वातावरण राहणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही उन्हाचा चटका अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडताना डोक्यावर टोपी, अंगावर हलके कपडे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला प्रशासन आणि हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे शेतकरी, कामगार, प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *