विषय :
शिरूर तालुक्याचा विश्वासू डिजिटल आवाज; www.shirurtaluka.com ची यशस्वी १५ वर्षे पूर्ण
प्रतिनिधी – अर्जुन शेळके
लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा विश्वास संपादन; निर्भीड पत्रकारितेचा प्रेरणादायी प्रवास
शिरूर : शिरूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या shirurtaluka.com� या डिजिटल वृत्त माध्यमाने यशस्वीपणे १५ वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत, जनतेच्या समस्या, विकासकामे, सामाजिक घडामोडी आणि लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे उल्लेखनीय कार्य या वेबसाईटने केले आहे.
दि. २६ मे २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील विधानभवनात या वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले होते. त्या दिवसापासून सुरू झालेला हा पत्रकारितेचा प्रवास आज अधिक व्यापक, प्रभावी आणि लोकाभिमुख ठरला आहे.
शिरूर तालुक्यातील गावागावातील घडामोडी, सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या तसेच जनतेच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वेबसाईटने सातत्याने केले आहे. स्थानिक पत्रकारितेला डिजिटल माध्यमातून नवी दिशा देत जनतेचा विश्वास संपादन करण्यात या माध्यमाला मोठे यश मिळाले आहे.
या १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत वेबसाईटने अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला. गरजूंना मदतीचा हात देणे, लोकहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधणे तसेच विकासकामांबाबत जनजागृती करणे यांसारख्या कामांमुळे ही वेबसाईट आज शिरूर तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
वेबसाईटला लाभलेली मोठी वाचकसंख्या, सोशल मीडियावर मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि वाढती फॉलोअर्स संख्या हीच तिच्या विश्वासार्हतेची साक्ष मानली जात आहे. या यशामागे संपादक तेजस फडके यांचे नेतृत्व तसेच सर्व पत्रकार, सहकारी आणि टीमची मेहनत, निष्ठा व पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरली आहे.
१५व्या वर्षपूर्ती निमित्त संपादक तेजस फडके, किरण पिंगळे मॅडम, अर्जुन शेळके, अक्षय टेमगिरे, सुनिल जिते, संपत कारकुड, अरुणकुमार मोटे, ओंकार भोरडे, योगेश शेंडगे यांच्यासह सर्व पत्रकार, सहकारी आणि वाचकवर्ग यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
निर्भीड, लोकाभिमुख आणि समाजहित जपणारी पत्रकारिता पुढील काळातही अशीच अधिक प्रभावीपणे सुरू राहो, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.




