“भ्रष्टाचाराविरोधात एल्गार; बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण”

अहेरी (प्रतिनिधी):Rjnews27marathi
भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा आवाज बुलंद करत अहेरी येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड व बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप अहेरी नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी गणेश बापूराव शहाणे यांच्यावर करण्यात आला असून, त्यांच्या सखोल चौकशीसह सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे समन्वयक राजेंद्र नामदेव कुलथे यांनी ५ मे २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. “खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळवून देणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांच्या मते, संबंधित अधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांचा आधार घेत दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले, ज्यामुळे शासनाच्या योजनांचा गैरवापर झाला असून, खऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तींवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या उपोषणामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, “भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे,” असा एकमुखी आवाज उठत आहे.
प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता लवकरच यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *