शिरूर सातारा रोड : ठेकेदारांच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांचा संताप
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? — ग्रामस्थांचा प्रश्न
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव

शिरूर सातारा रोडवरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरगाव, रांजणगाव सांडस, आंधळगाव, नाव्हरे या परिसरातील ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. अनेक अपघातांना या रस्त्याची दयनीय अवस्था कारणीभूत ठरली असून, अनेक तरुणांनी आपला जीव गमावला आहे. या रस्त्याची दुरवस्था पाहता ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठेकेदारांचा भोंगळ कारभार
ग्रामस्थांचा आरोप आहे की ठेकेदारांनी शासनाचा पैसा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरला असून, रस्त्याच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रस्ता करताना मोठे मोठे खड्डे कायम राहिले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
“शेत रस्त्यापेक्षा हा महामार्ग वाईट अवस्थेत आहे, प्रवाशांच्या सुविधेची तमा न बाळगता शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे,” असा आरोप ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी केला.

ग्रामस्थांचा पुढाकार
नागरगाव आणि रांजणगाव येथील ग्रामस्थांनी स्वतः खड्डे बुजवण्याचा निर्धार केला आहे. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे. गेली दोन ते तीन वर्षे काम सुरू असूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
मनसेची मागणी आणि उपोषणाचा इशारा
मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बाहेती यांनी या रस्त्यावर तातडीने डिव्हायडर, शक्य तिथे बस स्टॉप, सिग्नल लाईट आणि सावधानतेचे फलक बसवण्याची मागणी केली आहे. त्यांनी ठेकेदारांवर कारवाईसह रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन केले.
“ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बेफिकीर ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात लवकरच उपोषण करण्यात येईल,” असा इशारा बाहेती यांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती
या ठिकाणी झालेल्या खड्डे बुजवण्याच्या कामात नागरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सगन सर नारनोर, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष निलेश गव्हाणे, रांजणगाव ग्रामपंचायत सदस्य संतोष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथजी नलगे, गोरख नारनोर, सिताराम नलगे, रणदिवे (रांजणगाव सांडस), तसेच पारगाव मधील मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांनी मिळून ठेकेदारांच्या भोंगळ कामगिरीचा निषेध केला आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
ग्रामस्थांचा इशारा : जर रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षा उपाय तत्काळ करण्यात आले नाहीत, तर नागरगाव व रांजणगावसह संपूर्ण परिसरातील जनता उपोषणाच्या पवित्र्यात जाणार आहे.




