मांडवगण फराटा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत जल्लोष, मान्यवरांचा सन्मान – अश्रूंनी दिला बाप्पाला निरोप
प्रतिनिधी : बालाजी कांबळे

, मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे)
मांडवगण फराटा येथे लमाण तांडा व आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक समाजाच्या वतीने आयोजित बालाजी गणेश मित्रमंडळाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्तिभाव, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
गेल्या दहा दिवसांपासून या मंडळाने गावात विविध उपक्रम राबवत गणेशभक्तांना आनंदाचा पर्वणी दिली होती. संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, लहान मुलांचे नृत्यसादरीकरण अशा कार्यक्रमांनी गावातील महिला, मुले आणि युवकांना व्यासपीठ मिळाले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपणाऱ्या या उपक्रमांमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आता गणरायाला निरोप देण्याची वेळ आली होती. विसर्जनाच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलाल उधळत “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांनी आकाश दुमदुमून गेले. लहानग्यांपासून महिलांपर्यंत सर्वांनी संगीताच्या तालावर नाचून भावनिक जल्लोष केला. काही भक्तांना तर बाप्पाच्या निरोपाची वेळ आली म्हणून डोळ्यात अश्रू दाटून आले.
यावेळी बाभुळसर बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र हनुमंत नागवडे (उपाध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती) व अल्लाउद्दीन अलवी (शिरूर तालुकाप्रमुख आयटी सेल, भाजप) यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाणसर, सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विसर्जन सोहळ्याचे साक्षीदार झाले.
हा सोहळा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित राहिला नाही, तर एकोप्याचा, परंपरेचा आणि समाजजागृतीचा संदेश देऊन गेला. गणरायाला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती – ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!’




