दौंड, ता. प्रतिनिधी / विकास साळुंके :
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दौंड तालुक्यातील रोटी घाटाची चढण भक्तिभावाने पार करत बारामती तालुक्याकडे प्रस्थान केले. हवेली आणि दौंड तालुक्यातील हजारो भाविकांना पालखीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत भाविकांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली.

रोटी घाट परिसरात पहाटेपासूनच वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” आणि “रामकृष्ण हरी” या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाचा निनाद, वीणेचे सूर आणि संतांच्या अभंगांच्या गजरात वारकरी भक्तिमय वातावरणात पुढे मार्गक्रमण करत होते. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी विठ्ठलनाम आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची ओढ स्पष्टपणे जाणवत होती.
रोटी घाटाची अवघड चढण पार करताना वारकऱ्यांनी शिस्त, संयम आणि सेवाभावाचे दर्शन घडवले. वयाची कोणतीही मर्यादा न मानता लहान मुलांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत सर्वजण विठ्ठलनामाच्या गजरात आनंदाने चालत होते. अनेक स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ आणि सेवेकऱ्यांनी पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच वैद्यकीय सेवांची व्यवस्था करून वारकरी सेवेचा आदर्श घालून दिला.
पालखी मार्गावर विविध ठिकाणी फुलांची उधळण करून आणि आरती करून पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच समाजात शांतता, ऐक्य आणि सद्भावना नांदावी अशी प्रार्थना केली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुढील नियोजित मुक्कामासाठी बारामती तालुक्याकडे मार्गस्थ झाली असून, वारकऱ्यांचा भक्तिभाव, शिस्त आणि संतपरंपरेबद्दलची निष्ठा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेची अखंड परंपरा जपत विठ्ठलभक्तीचा संदेश देणारा हा पालखी सोहळा समाजात समता, प्रेम, सेवा आणि मानवतेची शिकवण देत पुढे सरकत आहे.




