यशवंत सहकारी साखर कारखान्याला नवा श्वास : 99.27 एकर जमीन विक्रीस राज्य मंत्रिमंडळाची परवानगी
थेऊर (ता. हवेली) – दीर्घकाळापासून ठप्प पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुर्नउभारणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन विक्रीस परवानगी दिली असून त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगळवारी (दि. 26) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कारखाना बंद होण्याची पार्श्वभूमी
यशवंत सहकारी साखर कारखाना मागील चौदा वर्षांपासून बंद आहे. आर्थिक गैरव्यवहार, तोटा आणि प्रचंड कर्जामुळे हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात गेला. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले, कामगारांचे पगार, शासन व व्यापाऱ्यांची देणी अशा अनेक देणग्यांमुळे कारखाना पुन्हा सुरू होणे कठीण झाले होते.
सभासदांचा एकमताने निर्णय
कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला भरीव निधी उभारण्यासाठी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने जमीन विक्रीचा निर्णय घेतला. कारखान्याच्या ताब्यातील 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत 299 कोटी रुपयांना जमिनीच्या विक्रीस मान्यता देण्यात आली होती.
मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
या प्रस्तावाला आता राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखान्याच्या पुर्नउभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असून, आगामी गाळप हंगामात कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे.
कारखान्याचे अध्यक्षांचे प्रतिपादन
कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले,
“कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार. शेतकरी, कामगार आणि सभासद यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील निर्णय घेतले जातील.”
???? ही घडामोड शेतकरी आणि कामगारांसाठी दिलासादायक ठरणार असून, बंद कारखान्याला पुन्हा एकदा नवा श्वास मिळण्याची आशा आहे.











