June 15, 2025 8:27 am

रांजणगाव गणपती तिहेरी हत्याकांडाची उकल : सामाजिक मूल्यांचा संकुचित आकडसर चेहरा उघड

रांजणगाव गणपती तिहेरी हत्याकांडाची उकल : सामाजिक मूल्यांचा संकुचित आकडसर चेहरा उघड; १५ दिवसांच्या तपासानंतर आरोपी जेरबंद

शिरूर, ता. ७ जून :
रांजणगाव गणपती औद्योगिक परिसरातील निर्जन भागात एका तरुणी आणि तिच्या दोन निष्पाप मुलांचा निर्घृण खून करून त्यांचे मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला असून, समाजातील स्त्री आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत तसेच कौटुंबिक प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनांमुळे घडणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात व्यापक जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

निर्घृण हत्या : प्रेम, प्रतिष्ठा आणि रक्तरंजित शेवट

दि. २३ मे रोजी, रांजणगाव गणपती येथील ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिरामागील कचराडोंगरी भागात एका २५ वर्षीय महिलेचा आणि तिच्या दोन चिमुरड्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतांची ओळख स्वाती केशव सोनवणे (रा. वाघोरा, जि. बीड) आणि तिची मुले स्वराज (४) व विराज (२) अशी पटली. घटनास्थळाचा थरकाप उडवणारा दृश्य अत्यंत क्रूर आणि अमानवी होता.

प्राथमिक तपासात उघड झाले की, आरोपी गोरख पोपट बोखारे (३६), जो की मृत स्वातीचा बहिणीचा दीर आहे, त्याने कुटुंबाच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी हे भयंकर कृत्य केले. स्वातीने प्रेमविवाह केला होता आणि यामुळे कुटुंबीय नाराज होते. समाजाच्या “काय म्हणतील” या दबावाखाली आरोपीने तिचा आणि दोन बालकांचा गळा आवळून, दगडाने ठेचून खून केला व पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांची अथक शर्थ : १५ दिवसांचा शोध आणि तांत्रिक तपासाचा वापर

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी सहा विशेष पथकं तयार करण्यात आली. या पथकांनी रांजणगाव एमआयडीसीसह शिक्रापूर, शिरूर, दौंड व बीड जिल्ह्यात शोध मोहीम चालवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि मनोवैज्ञानिक प्रोफाईलिंग यांचा वापर करून आरोपीला अखेर बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

या तपासात पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, महादेव वाघमोडे, विश्वास जाधव आणि इतर तपास अधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली. ग्रामीण पोलिसांच्या कष्टाचे आणि शिस्तबद्ध तपासाचे हे उत्तम उदाहरण ठरले.

समाजाला अंतर्मुख करणारे गंभीर प्रश्न

या हत्याकांडाने पुन्हा एकदा काही मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणले आहेत :

प्रेमविवाहामुळे कुटुंबाची ‘इज्जत’ जाते या जुनाट, पुरुषप्रधान मानसिकतेने किती आयुष्यांचा बळी घेतला पाहिजे?

एक स्त्री स्वतंत्र निर्णय घेते म्हटल्यावर तिच्या आयुष्याची किंमत शून्य का ठरते?

दोन निष्पाप बालकांची कोणती चूक होती? त्यांच्यावर झालेला अत्याचार ही समाजाच्या नीतीमूल्यांची अपयशाची पावती नाही का?

हत्येची केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक जबाबदारी

गोरख बोखारेसारखा आरोपी केवळ एक गुन्हेगार नाही, तो समाजाच्या आत खोलवर रुजलेल्या स्त्रीद्वेष, मानहानी आणि चुकीच्या प्रतिष्ठेच्या संकल्पनांचा जिवंत पुरावा आहे. अशा घटनांना केवळ पोलिसी कारवाई पुरेशी नाही, तर समाजात मानसिक आरोग्य, समुपदेशन, शिक्षण आणि महिलांच्या स्वातंत्र्याचा स्वीकार वाढवणारी जनचळवळ निर्माण होणे आवश्यक आहे.

 

न्यायाच्या दिशेने एक पाऊल, पण प्रवास अद्याप बाकी

या गुन्ह्याची उकल आणि आरोपीला अटक ही निश्चितच पुणे ग्रामीण पोलिस दलाची मोठी कामगिरी आहे. मात्र या घटनेमागील सामाजिक मानसिकतेचा खात्मा करणे हे अधिक मोठे आव्हान आहे. समाजाने या घटनेपासून शिकले पाहिजे — अन्यथा अशी अमानुषता पुन्हा कोठेतरी नक्कीच डोकावेल.

लेखक – RJNEWS27MARATHI.COM प्रतिनिधी

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें