शिरूर तालुक्यातील करडे गावात शेतकऱ्याचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
प्रतिनिधी – शिरूर
शिरूर तालुक्यातील करडे गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, विहीरीवरील मोटार चालू करत असताना तोल जाऊन विहीरीत पडल्याने ३१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव पवन अशोक बांदल (वय ३१ वर्षे, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असून, घटना २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारास घडली. याबाबत श्रीनिवास अशोक बांदल (वय ३५ वर्षे, रा. करडे) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली असून, सदर घटनेची नोंद गुन्हा रजि. क्र. ५५/२०२५ भा.दं.सं. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९:३० वाजता पवन बांदल नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी निघाला होता. त्यावेळी त्यांच्या भावाने त्याला शेतातील विहीरीवरील मोटार चालू करण्यास सांगितले. मात्र दुपारी १२:४५ वाजेपर्यंत मोटार चालू न झाल्यामुळे श्रीनिवास बांदल शेतात गेले. शेतात पोहोचल्यावर त्यांना पवन यांची मोटारसायकल (MH-12-QV-9852) आणि कामाचे साहित्य तिथेच दिसले, मात्र पवन कुठेच दिसला नाही.
शंका येऊन त्यांनी विहीरीत पाहिले असता पवन पाण्यात तरंगताना दिसला. त्याला पोहता न येत असल्यामुळे तो मोटार चालू करत असताना विहीरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती तात्काळ कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना देण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने आणि पोलीसांच्या हस्तक्षेपाने पवन याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले. तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला न्हावरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची नोंद एन्ट्री क्र. ५८/२०२५ प्रमाणे करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पो. हवा. भोते (बॅज नं. १२५२) करत असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
पवन बांदल यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.