June 20, 2025 9:20 am

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बेशिस्त वाहन पार्किंगवरून पोलीस व कंपनी प्रतिनिधींची बैठक संपन्न

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बेशिस्त वाहन पार्किंगवरून पोलीस व कंपनी प्रतिनिधींची बैठक संपन्न
शिरूर प्रतिनिधी

रांजणगाव, ता. शिरूर:
रांजणगाव – कारेगाव एमआयडीसी परिसरातील ढोकसांगवी गावाजवळ गेल्या काही वर्षांपासून बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले. बैठकीला विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अपघात आणि मागील घटनांची पार्श्वभूमी

18 फेब्रुवारी 2018 रोजी झामील स्टील इंडस्ट्रीजच्या नो-पार्किंग क्षेत्रात रिफ्लेक्टर व रेडियम नसलेल्या ट्रकमुळे कैलास चंदर पाचंगे यांचा गंभीर अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये तब्बल 12 लाख रुपये खर्च करून उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर अशाच स्वरूपाचे अनेक अपघात घडले. त्यामुळे पाचंगे कुटुंबीयांनी 1 सप्टेंबर 2021 रोजी एमआयडीसीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसीने 6 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस स्टेशनला कारवाईचे निर्देश दिले. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित कार्यवाही झालेली नव्हती.

संघटनांचा पाठपुरावा व ग्रामसभेचे ठराव

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मोर्चाचे अध्यक्ष काशिनाथ पाचंगे आणि महिला अध्यक्षा प्रियांका ताई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा विषय सतत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला गेला. 07 जुलै 2023 आणि 03 फेब्रुवारी 2025 रोजी ढोकसांगवी ग्रामसभेत बेशिस्त वाहन पार्किंगविरोधात ठराव संमत करण्यात आले होते. त्यानंतर देखील परिस्थितीत फारसा फरक न पडल्यामुळे, पुनश्च पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

बैठकीत उपस्थित असलेल्या झामील स्टील, बेजल, गृपो अँटोलीन, फियाट, टाटा स्टील या कंपन्यांच्या प्रतिनिधींना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्पष्ट सूचना दिल्या:

टाटा चौक ते ढोकसांगवी मार्गावरील अवैध व बेशिस्त वाहन पार्किंगवर कडक कारवाई केली जाईल.

प्रत्येक कंपनीने पार्किंग मार्शलची नियुक्ती करावी.

कंपनीच्या गेटपासून काही मीटर अंतर राखूनच वाहने लावावीत.

स्थानिक ग्रामस्थांच्या वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

जनआक्रोश मोर्चाचा इशारा

काशिनाथ पाचंगे आणि प्रियांका ताई जगताप यांनी बैठक संपल्यानंतर स्पष्ट इशारा दिला की,
“जर बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
रस्ते खुले ठेवणे आणि वाहन चालकांना शिस्त लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें