पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय, बाभुळसर बुद्रुक येथे NMMS व NSSE परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला
अल्लाउद्दीन अलवी, प्रतिनिधी | दिनांक : १७ एप्रिल | बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय, बाभुळसर बुद्रुक येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीची NMMS (National Means-cum-Merit Scholarship) व NSSE (National Science Search Examination) परीक्षा २०२५ मध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यालयाच्यावतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष हनुमंतभाऊ पाटोळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष सचिन बापू मचाले, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष अंकुश आबा नागवडे, संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन मनोहर मचाले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नवनाथ आप्पा नागवडे, पोलीस पाटील मीनाताई पाडळे, माजी सरपंच भाऊसाहेब माने, माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार हांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. प्रास्ताविकात बोलताना अंकुश आबा नागवडे यांनी सांगितले की, शिक्षकांचे बौद्धिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यामुळेच विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. शिक्षक हे खऱ्या अर्थाने यशाचे शिल्पकार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सचिन बापू मचाले यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीचा उल्लेख केला. शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेला शालेय विकास निधी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने भविष्यातील निधीसाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन घुटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपनर सर यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक जे. डी. पवार, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक समिती सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.