आई गमावलेल्या पत्रकाराची न्यायासाठी आर्त हाक; संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी
शिक्रापूर (पुणे) – “साध्या भाजी खरेदीसाठी गेलेल्या माझ्या आईला आज मी कायमचं गमावलं… हा अपघात नव्हे, तर कुठेतरी अन्याय आहे,” अशा भावना व्यक्त करत पत्रकार निलेश जगताप यांनी त्यांच्या आई नंदा जगताप यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.
ही घटना पाबळ चौकात घडली. नंदा जगताप भाजी खरेदीसाठी बाहेर गेल्या असताना तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी एका खाजगी इमारतीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने देखील त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मुलाचं भावनिक निवेदन:
पत्रकार निलेश जगताप यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, “आईच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्या कोणत्यातरी दबावाखाली होत्या. भाजी आणायला गेलेल्या माझ्या आईचा मृतदेह परत आला हे मला अजूनही स्वीकारता येत नाही. यामागे केवळ एक वाद नव्हे, तर गंभीर मानसिक तणाव होताच.”
न्यायासाठी संघ एकवटला:
या घटनेनंतर ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघा’च्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर यावं आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात फक्त पोलीस कर्मचारी नव्हे तर संबंधित महिला कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार दाखल व पुढील कार्यवाहीची मागणी:
या प्रकरणाची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू असून, मृत्यूच्या नेमक्या कारणांची तपासणी करण्यात येत आहे.
पत्रकार संघाचे उपस्थित पदाधिकारी:
या वेळी पत्रकार संघाच्या महिला राज्य सचिव मंगलाताई सासवडे, पुणे जिल्हाध्यक्ष शकील मणियार, शिरूर तालुका अध्यक्ष विजय कांबळे, तालुका संपर्कप्रमुख चेतन पडलवळ, संघटक संतोष कांदे, सल्लागार नितीन मिसाळ आणि तालुका सदस्य शरद रासकर उपस्थित होते.